जनजागृती



============================================================================

 मुख्य प्रवाह

आदिवासी विकासाच्या योजना (गप्पा) जेव्हा जेव्हा माझ्या कानावर पडतात, तेव्हा बहुतेक तज्ञ व्यक्ति 'आदिवासी मुख्य प्रवाहात' आला पाहिजे असे मत व्यक्त करतात. मुख्य प्रवाह म्हणजे काय असा जर उलट प्रश्न केला तर बोलणा-या व्यक्तिच्या नजरा पुणे, मुंबई अशा मायावी नगरांकडे जातात. आता हा मुख्य प्रवाह खरच स्विकारण्यालायक आहे का? 

 

शहरी भाग म्हटला की बेरोजगारी, गुन्हेगारी, संस्कृतीचा -हास, मुलींची गर्भात केली जाणारी हत्या, पैसा म्हणजे सर्वस्व, स्वार्थी जीवनशैली अशा अनेक बाबी ज्या सामान्य जीवनाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करत असतात. अलीकडे बलात्कार, अपहरण, बाल गुन्हेगार, व्यसने अशा विकृती वाढत आहेत. शिक्षण शहरात चांगले असते असे म्हटले जाते, मग याच शिक्षणात या समस्या कमी होतील यावर काही उपाय सापडत नाही. 

 

वरील समस्या आज तथाकथित मुख्य प्रवाहाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. याच प्रवाहात न्याय या गोष्टीला पैशात तोलले जात आहे. समाधान ही बाब या प्रवाहातुन अगदी संपुष्टात आलेली आहे. 

 

आता विचार करा मित्रांनो, स्वताच्या पदरात काही नाही पडले तरी चालेल परंतु आपला शेजारी, आपले कुटुंब, आपला गाव, आपला समाज सुखात असला पाहिजे ही आदिवासी संस्कृती. निसर्गाला आपला पाठीराखा मानून त्याचे जतन आणि संवर्धन हेच संस्कार....खिशात रुपया नसला तरी काही फिकिर नाही...खरे तर खिसा असतोच कुठे हां मोठा प्रश्न...वस्तू विनिमय आणि मदतीची भावना यामुळे पैशाची गरजच नसते. दोन घास आपल्या पोटात गेल्यावर घरातील कुत्रे, मांजरे, गाई, जनावरे, पक्षी यांचाही विचार आमचे आदिवासी बांधव करतात. आम्ही यालाच देव मानले आहे. 

 

जगण्याचे दोन्ही प्रवाह आपल्या समोर आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे म्हणजे नक्की काय तर त्यांना अनंत समस्यान्च्या गराड्यात सोडून द्यायचे सडत-कुढ़त मर मर जगण्यासाठी....काही लागले असतीलही नोकरीला....परंतु संस्कृतीविना त्यांचे समाजमुल्य तरी काय? काडी मात्र किंमत नसणारे जीवन जिथे नशिबात येणार असा मुख्य प्रवाह जाणिवपूर्वक तर चर्चेत आणुन राबविला जात नसेल ना असाही विचार करण्याची गरज आज आदिवासी बांधवांसमोर आहे.

 

मुख्य प्रवाहातील समस्या सोडवयाच्या असतील तर त्याला एक प्रभावी मार्ग आहे आणि तो म्हणजे आदिवासी संस्कृती...परंतु असे असताना आदिवासी वनसंपत्ती, जमीन, जल यावर डोळा ठेवून असणारे कारखानदार आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा कट करून आदिवासीला मारण्याचा खुलेआम प्रयत्न करत आहेत. 

 

जगात प्रगतीबरोबर शांतीच्या मार्गाने समाधानाचे जीवन जगायचे असेल तर आदिवासी संस्कृतीचा मार्ग मुख्य प्रवाहातील लोकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.

                                                - Raju Thokal

 


=============================================================================

अमेरिकेतील रेड इंडियन्स, ब्राझीलमधील कोगुई, अमेझॉन, फिलिपाइन्समधील बंटुक, कलिंग या आदिवासींना सुधारण्याच्या नावाखाली सशस्त्र टोळ्यांचा धाक दाखवून, दारूचे पाट वाहवून, रोगराईचा फैलाव करून, कर्जबाजारी करून जमिनी बळकावल्या. त्यांना निराधार केले व कित्येक वंश नष्ट केले. बांगला देशात सुमारे १२०० आदिवासींना घरात कोंडून सैनिकांनी जिवंत जाळले. इराकमध्ये कुर्दिश आदिवासींवर अशाच प्रकारचे दडपण अन्याय चालू आहेत. 

 

जगातील हे चित्र नीट अभ्यासा……एकी आणि सामाजिक जाणीव जागृतीची उणीव यामुळे जागतिक स्तरावरील अनेक आदिवासी जमाती आज संपुष्टात आल्या-आणल्या आहेत. उद्या ही वेळ भारतातील आदिवासींवर का येणार नाही? कारण आज आदिवासी भूमिहीन केला जातोय…..कुपोषणाच्या विळख्यात भावी पिढी खुडली जातेय……दर्जाहीन शिक्षणाने फक्त कारकून घडवले जात आहेत 

 

चाकरीसाठी………व्यसनांना खतपाणी घातले जात आहे……दवाखाने आलेत…पण डॉक्टर गायब आहेत….परिणामी आजारपणात अनेकांचा मृत्यू…..अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात आजचा आदिवासी अडकलेला आपणास दिसतोय. जगण्याच्या या चक्रव्युहातून बाहेर पडलेली शिक्षित मंडळी काही प्रमाणात स्वताला समाजापासून अलिप्त मानण्यात धन्यता मानत आहे. अशा परिस्थितीत सरकारी अन्याय असह्य झाल्याने अनेकजण अनीतीच्या मार्गाचा अवलंब करत असल्याने नक्षलवादासारख्या समस्या वाढीस लागून त्यात आदिवासी समाज भरडला जातोय……नक्षलवाद काही प्रमाणात वाढू देणे आणि त्याच्या नावाखाली संपूर्ण समाजच नष्ट करण्याचे कदाचित षडयंत्र असावे…….नाही तर देशासाठी आपला जीव ओवाळून टाकणारी आपली जंगलातील माणसे देशाच्या संरक्षणात पुढाकार घेणा-यांच्या विरोधात का उभी राहतील.



खरच खूप विचार केला कि खूप ताण वाढतो डोक्यात…..मग नीट उत्तरे नाही मिळाली कि मग जीवनाविषयी अनास्था वाढते….म्हणून अधिक विचार न करता आज सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा कधी दारू, तर कधी नक्षली कारवाया याच्या नावाखाली टिपून टिपून मारतील भाडखाऊ आपणास.

 

--राजू ठोकळ




0 comments:

Post a Comment

 

Popular Posts

प्रतिक्रिया...

भलरत्रैमासिक हे आदिवासी समाजासाठी असून त्यात आपणास सुचणारे अपेक्षित बदल सुचविण्याचा अधिकार सर्वांना आहे. आपल्या सुचना किंवा प्रतिक्रिया bhalarmasik@gmail.com वर किंवा ९८९०१५१५१३ या नंबरवर Whats App करा.

Total Pageviews

Vidrohi Adivasi

Followers